अवैध सावकारांवर धडक कारवाई करा; तक्रारी तातडीने निकाली काढा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : जिल्ह्यात अवैध सावकारीचा विळखा तोडण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. अवैध सावकारांच्या दडपशाहीला बळी न पडता पीडित शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी धाडसाने पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असेही त्यांनी आवाहन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत गठीत त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. संबंधित प्रकरणांमध्ये नोटीस पोहोच झाल्याची खात्री करून गुणवत्तेवर निर्णय घ्यावेत, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे व अन्य अधिकारी उपस्थित होते. डॉ. आशिया म्हणाले, गरजू नागरिकांनी परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घ्यावे. जादा व्याज आकारून त्रास दिल्यास सहकार विभागाकडे तक्रार दाखल करावी.
जिल्ह्यात अवैध सावकारी करणाऱ्या २१ सावकारांविरोधात विविध तालुका पोलीस ठाण्यांत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमांतर्गत २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १९ अपील प्रकरणांत २५ हेक्टर १५.५ आर जमीन व २,२०० चौ.फुट बांधकाम शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शासनाने परवानाधारक सावकारांसाठी व्याजदर निश्चित केले असून, शेतकऱ्यांसाठी तारण कर्ज ९ टक्के, विनातारण १२ टक्के; तर बिगरशेतकऱ्यांसाठी तारण १५ टक्के व विनातारण १८ टक्के व्याजदर लागू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
प्रशासनाच्या या इशाऱ्यामुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले असून, पुढील काळात जिल्ह्यात मोठी कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.
