पारंपरिक कारागिरांच्या सक्षमीकरणासाठी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना’ला जिल्ह्यात गती
७ हजार ६३२ कारागिरांना प्रशिक्षण ; ५०४ कारागिरांना बँक कर्ज वितरित
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि. २३ – भारत सरकारच्या ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजने’ला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ७ हजार ६३२ पारंपरिक कारागिरांना १५ प्रशिक्षण केंद्रांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापैकी ५०४ कारागिरांना बँकांमार्फत कर्ज वितरित करण्यात आले असून उर्वरित लाभार्थ्यांच्या कर्ज प्रक्रियेस गती देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बालासाहेब मुंडे यांनी दिली.
ही योजना पारंपरिक कलेचा सन्मान राखत कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य प्रदान करणारी आहे. देशाच्या सांस्कृतिक व औद्योगिक परंपरेला बळकटी देणाऱ्या या योजनेचा उद्देश पारंपरिक व्यवसायात गुंतलेल्या कारागिरांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे.


योजनेअंतर्गत पारंपरिक कौशल्य असलेल्या व्यक्तींना व्यवसायासाठी एकूण ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज केवळ ५ टक्के व्याजदराने मिळू शकते. पहिल्या टप्प्यात १ लाख व दुसऱ्या टप्प्यात व्यवसाय विस्तारासाठी २ लाख रुपये मंजूर केले जातात. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना दररोज ५०० रुपये स्टायपेंड दिला जातो.
योजनेत सुतार, लोहार, मूर्तिकार, सोनार, नाभिक, धोबी, कुंभार, चर्मकार, विणकर, राजमिस्त्री, नाव बनवणारे, घंटा घडवणारे, तांब्या-पितळ काम करणारे, घड्याळ व दुरुस्ती करणारे, खेळणी बनवणारे, चाकू-कात्री धार करणारे, झाऱ्यांचे काम करणारे व झोळ्या-सुतपिशव्या तयार करणारे व्यवसाय समाविष्ट आहेत.
डिजिटल साक्षरता, ब्रँडिंग व विपणन प्रशिक्षण : –
योजनेत कारागिरांना उत्पादनांचे ब्रँडिंग, विपणन व डिजिटल व्यवहारासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. सोशल मिडिया व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्पादने विक्रीसाठी मार्गदर्शनही दिले जाते.
सुलभ ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
योजनेसाठी अर्ज pmvishwakarma.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन करता येतो. Apply Online लिंकवर क्लिक करून नोंदणी केल्यानंतर नोंदणी क्रमांक व पासवर्ड SMS द्वारे प्राप्त होतो. त्यानंतर फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात.
पात्रता व आवश्यक कागदपत्रे :-
अर्जदार भारताचा नागरिक असावा, वय १८ ते ५० वर्षांदरम्यान असावे व १८ पारंपरिक व्यवसायांपैकी कोणत्याही एकाशी संबंधित असावा. अर्जासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी दाखला, पासपोर्ट साइज छायाचित्र, बँक पासबुक व मोबाईल क्रमांक आवश्यक आहेत.प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कौशल्यांना नवसंजीवनी देणारी असून ग्रामीण व शहरी कारागिरांना आत्मनिर्भरतेकडे नेणारे महत्त्वाचे माध्यम ठरत आहे. पारंपरिक व्यवसायांना नवचैतन्य देत ही योजना ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे.