समृद्ध नगर न्यूज नेटवर्क –
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सर्वाधिक लाभार्थी जिल्ह्यातील 72 हजार 559 शेतकऱ्यांच्या खात्यात 697 कोटी रुपयांचा निधी वर्ग. आधार प्रमाणीकरणामध्ये राज्यात प्रथम जिल्हा बँकेच्या 65 हजार 656 शेतकऱ्यांचा समावेश इतर बँकेचे 6 हजार 903 शेतकरी आधारी प्रमाणीकरण करुन घेण्याचे आवाहन केले आहे.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कर्जमुक्ती योजनेच्या ऑनलाईन लाभ वितरणास प्रारंभ होऊन पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली. यावेळी पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

अहिल्यानगर जिल्ह्यातील 72 हजार 559 शेतकऱ्यांच्या खात्यात 697 कोटी 81 लाख 25 हजार 139 रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
राज्यातील शेतकरी हा राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे. मात्र, अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे काही वेळेस पिकांचे नुकसान होते. त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाही. असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकाकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती.
त्यानुसार जिल्ह्यातील 72 हजार 559 शेतकऱ्यांच्या खात्यात 697 कोटी 81 लाख 25 हजार 139 रुपयांचा लाभ देण्यात आला. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आली. यात अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 65 हजार 656 शेतकरी सभासदांना 622 कोटी 74 लाख रुपये एवढ्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तसेच अन्य राष्ट्रीयकृत बँकांमधील सहा हजार 903 शेतकरी सभासदांना 75 कोटी 07 लाख 25 हजार 139 रुपये रकमेच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आर्थिक बळ मिळेल. पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यांवरही लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने हस्तांतरित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांनीही आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या योजनेत जिल्ह्यातील एकूण 2 लाख 33 हजार 711 शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 1 लाख 32 हजार 591 पात्र शेतकऱ्यांच्या समावेश आहे. त्यापैकी 1 लाख 15 हजार 692 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. 8 हजार 363 शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आयडी काढलेला नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी काढावा तसेच जे मयत खातेदार आहेत अशा खात्यांच्या बाबतीत त्यांच्या वारसाने विकास संस्थेकडे, बँकेकडे वारसाची नोंद लावून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.
