राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला डॉ. सी. डी. मायी कृषीतज्ज्ञ पुरस्कार प्रदान
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क नागपूर, ता. १८ – कृषी क्षेत्रात लागवड, बियाणे, सिंचन, खत व्यवस्थापन या सर्वच बाबतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राजेंद्र पवार यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपली कटिबद्धता सिद्ध केली, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बारामतीच्या ‘ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे चेअरमन राजेंद्र पवार यांचा गौरव केला.

ज्येष्ठ कृषि शास्त्रज्ञ, मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु, ICAR चे माजी संचालक डॉ. सी. डी. मायी यांच्या सन्मानार्थ कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी नागपूर कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने ‘डॉ. सी. डी. मायी कृषि तज्ज्ञ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारचे स्वरुप आहे.

यंदा बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला हा पुरस्कार जाहीर झाला असून ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ते बोलत होते. पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. सी. डी. मायी, ज्येष्ठ कृषी पत्रकार सुधीर भोंगळे, कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, श्रीराम काळे हे यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. गडकरी म्हणाले, ‘‘ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती ही संस्था महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील एक अग्रगण्य संस्था असून या ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण भागात कृषि, शिक्षण, सर्वांगीण विकास, महिला सक्षमीकरण व उद्योजकतेच्या विकासासाठी कार्य केले जाते. ट्रस्टचे चेअरमन म्हणून राजेंद्र पवार यांचे कृषी क्षेत्रातील कार्य आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यामुळे डॉ. सी. डी. मायी यांच्या नावाने असलेला पुरस्कार या ट्रस्टला मिळत असल्याचा मनापासून आनंद वाटतो.’’ डॉ मायी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने कार्य करीत आहेत. सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांचे कार्य सुरू आहे, ही आदर्श बाब आहे. त्यांच्याच प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात नर्सरी कायदा आल्याचा उल्लेखही गडकरी यांनी यावेळी केला.
गडकरी म्हणाले, ‘‘शेतीमध्ये जमीन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. दर्जेदार उत्पादनासाठी माती परीक्षण आवश्यक आहे. पाण्याच्या संदर्भात काम करण्याची गरज आहे. ठिबक सिंचन, ड्रोनद्वारे फवारणी हेही घटक शेतीमध्ये महत्त्वपूर्ण ठरत आहेत. या सर्व तंत्रांचा वापर शेतीमध्ये केला तरच एकरी उत्पन्न वाढेल आणि शेतकरी समृद्ध होईल. राजेंद्र पवार आणि त्यांचा ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यासंदर्भात सातत्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करत आहे, ही निश्चितच समाधानाची बाब आहे.’’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा फडणवीस यांनी केले.
