जामखेड–सौतडा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तहसीलदारांना निवेदन
१० दिवसांत काम न झाल्यास आंदोलनाचा इशारा
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – दि. ५ :
जामखेड–सौतडा राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असून अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. या रखडलेल्या कामामुळे जामखेड शहर व तालुक्यातील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खोदकाम करून काम अर्धवट सोडण्यात आल्याने ठिकठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी वारंवार वाहतूक कोंडी होत असून शाळा, महाविद्यालये, रुग्णालये व बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांना वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात वाढले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे स्थानिक व्यापारावरही विपरीत परिणाम झाला असून विकास कामांना खीळ बसली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

या गंभीर बाबी लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जामखेड तालुका अध्यक्ष प्रा. प्रशांत जालिंदर राळेभात यांच्या वतीने जामखेडचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग विभागाला तातडीने आदेश देऊन सदर रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी शहाजी राळेभात, इस्माईल सय्यद, संदीप गायकवाड, निखिल घायतडक, डॉ. कैलास हजारे, सूर्यकांत सदाफुले, अमोल गिरमे, प्रवीण उगले, कुंडल राळेभात, सागर भोसले, लक्ष्मण गोरे, वैजनाथ पोले, बापू कार्ले, दादा महाडिक, इम्रान तांबोळी, रवींद्र आष्टेकर, अमोल लोहकरे, सचिन शिंदे, संदीप साबळे, सागर सदाफुले, संदीप अडाले, मनोज राळेभात, बिलाल शेख, मनोज कार्ले, नासिर चाचू सय्यद, गणेश गायकवाड, दादा शिंदे, गजानन ढवळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, येत्या १० दिवसांच्या आत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास किंवा संबंधित प्रशासनाने ठोस कार्यवाही केली नाही, तर समस्त जामखेडकर नागरिकांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याच्या कामाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
