आ रोहित पवार यांची आमसभा चालली आठ तास, नागरिकांच्या प्रश्नांनी अधिकाऱ्यांची उडाली दैना
उद्याच्या जामखेड च्या आमसभेकडे लक्ष
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क –
कर्जतमध्ये आयोजित केलेल्या आमसभेत नागरिकांच्या तक्रारी समजून घेऊन अधिकाऱ्यांकडून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. सकाळी अकराच्या सुमारास सुरु झालेली आमसभा पावणेसात वाजण्याच्या सुमारास संपली. या सलग वेळेत नागरिकांच्या तक्रारी ऐकूण घेतल्या, यावरून प्रशासनाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी असल्याचं स्पष्ट होतं.
नुकत्याच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना कोणत्याही शेतकऱ्याला यातून वगळण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या. याशिवाय वीज कनेक्शनबाबत अडवणूक, डीपी न बसवणे, निकृष्ट दर्जाचं होणारं काम, रस्ते अडवणं, काही शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसणं, रेशनकार्ड न मिळणं, पैसे घेऊन बोगस रेशनकार्ड देणं, पात्र असूनही डोल न मिळणं, कामं मंजूर असूनही त्यांचं टेंडर रखडणं, वाहून गेलेल्या रस्त्यांची दुरुस्ती, सीना नदीला आलेल्या पुरामुळं झालेलं नुकसान, बंधाऱ्यांच्या गेटचे प्रश्न, वनविभागाकडील तक्रारी, रोजगार हमी योजनेतील वैयक्तिक लाभाच्या योजना राबवताना लाभार्थ्यांना देण्यात येणारा त्रास, त्यांच्याकडून पैसे उकळणं, रोजगार हमी योजनेत मंजूर करुन आणलेल्या विहिरींची बिले काढण्यासाठी पैसे मागणं, लंपीचं लसीकरण, प्रशासनाकडून झालेली अनेक चुकीची कामं, पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांकडं दुर्लक्ष करणं, अधिकारी वेळेत न भेटणं अशा अनेक तक्रारींचा पाऊस नागरिकांनी यावेळी पाडला. सामान्य नागरिकांच्या एवढ्या तक्रारी असतील तर प्रशासनानेही आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. गोर-गरीब जनतेकडून पगारी सरकारी नोकर कामसाठी पैसे मागत असतील तर हे लाजीरवाणी गोष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीत सामान्य जनतेला त्रास झाला नाही पाहिजे आणि त्यांची कामं वेळेत झाली पाहिजेत, अशी अपेक्षावजा सूचना यावेळी प्रशासनाला केली.

पुढील काळात नियमितपणे अशा प्रकारे आमसभा आयोजित केल्या जातील आणि त्यावेळी कुणी चुकीचं काम केल्याचं किंवा सामान्य नागरिकांना त्रास दिल्याचं आढळून आलं तर ही बाब कदापि खपवून घेतली जाणार नाही, हेही यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळं सर्वच विभाग आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करतील आणि लोकाभिमुख काम करतील, ही अपेक्षा!
आजच्या आमसभेला उपस्थित तहसीलदार, बीडीओ यांच्यासह सर्व विभागांच्या अधिकारी उपस्थित होते.
