वाराणसीतील मणिकर्णिका घाटावरील ऐतिहासिक मंदिरे तोडल्याच्या निषेधार्थ जामखेड येथे निवेदन
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – :
वाराणसी येथील गंगा नदीच्या काठावर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावरील मंदिरे व ऐतिहासिक वास्तू विकासाच्या नावाखाली तोडण्यात आल्याच्या घटनेचा जामखेड येथे निषेध करण्यात आला. या संदर्भात तहसील कार्यालयात तहसीलदारांना निषेध निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, मणिकर्णिका घाटावरील मंदिरे व वास्तू या भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहेत. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेली ही मंदिरे श्रद्धा, परंपरा व इतिहासाचे प्रतीक असून शेकडो वर्षांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिली आहेत.
सध्या सुरू असलेल्या सुधारणा व विकासकामांच्या नावाखाली या प्राचीन वास्तूंची तोड करण्यात येत असल्याची माहिती समोर आली असून, ही बाब दुर्दैवी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विकासाच्या प्रक्रियेत ऐतिहासिक व धार्मिक वारशाचे जतन करणे आवश्यक असताना, त्याची तोडफोड होणे योग्य नसल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.

सदर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन मणिकर्णिका घाटावरील तोड थांबवावी तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या सर्व मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांच्यासह शरद फरांडे, पांडुरंग माने, भैय्या खरात, नितीन राऊत, ऋषिकेश सोनवणे, संजय खरात, मनीष मासाळ, सचिन काशिद, नितीन खेत्रे, आदित्य थोरात, नाना इंगळे, भाऊ पोटफोडे, आदित्य राजगुरू, संतोष शिंदे, मनोज राळेभात, अनिल बिराजदार, महारुद्र नागरगोजे व धारकरी बंधू उपस्थित होते.
