उजनीचे पाणी जामखेडला मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट होऊन संघर्ष करावा – अंकुशराव ढवळे
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : जामखेड तालुक्यातील १९ गावांसाठी उजनी तलावाचे पाणी आणणे ही अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची गरज असून, यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी एकजूट होऊन नियोजनबद्ध संघर्ष उभारण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी उपसभापती पंचायत समिती जामखेड अंकुशराव ढवळे यांनी केले.

“मागितले तर मिळते, पण त्यासाठी सातत्याने पाठपुरावा आणि रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागतो. कर्जत, आष्टी, करमाळा, माढा या तालुक्यांना पाणी मिळाले, मग जामखेडला का नाही?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी पाणीप्रश्नी शेतकऱ्यांनी सजग आणि संघटित होण्याचे आवाहन केले. आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी, शेतीच्या टिकावासाठी आणि गावांच्या विकासासाठी उजनीचे पाणी जामखेडला आणणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

ढवळे म्हणाले, पाणी हा केवळ शेतीचा नव्हे तर सर्वांगीण विकासाचा प्रश्न आहे. पाणी आल्यास शेती उत्पादन वाढेल, पिकांची विविधता वाढेल, रोजगारनिर्मिती होईल आणि स्थलांतर थांबेल. त्यामुळे या प्रश्नाकडे सर्वांनी गांभीर्याने पाहून सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
याचबरोबर अरणगाव सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वीज समस्येबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ट्रान्सफॉर्मर (डीपी) जळाल्यास शेतकऱ्यांनी स्वतःहून कोणतेही पैसे खर्च करू नयेत. डीपी जळाल्यानंतर त्याचा ऑनलाइन रिपोर्ट आपल्या व्हॉट्सअॅपवर पाठवावा, संबंधित शेतकऱ्यांची जळालेली डीपी पुन्हा बसवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले.
ज्या शेतकऱ्यांच्या डीपी वर्षभरात चार ते पाच वेळा जळतात, त्यांनी त्याची माहिती द्यावी. अशा ठिकाणी कायमस्वरूपी उपाय म्हणून मोठ्या क्षमतेची डीपी बसविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी बांधवांनी पाणी आणि वीज या दोन्ही मूलभूत प्रश्नांवर एकत्र येऊन संघटित प्रयत्न केल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वासही ढवळे यांनी व्यक्त केला.
– श्री. अंकुशराव ढवळे
माजी उपसभापती, पंचायत समिती जामखेड
