तुकाई उपसा जलसिंचन योजनेचे काम १५ जुलैपर्यंत पूर्ण करा; भैरवनाथ योजनेचा प्रस्ताव ऑगस्टअखेर सादर करा : सभापती प्रा. राम शिंदे
दोन्ही योजनांच्या प्रगतीचा उच्चस्तरीय आढावा; कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क | मुंबई | दि. १७ जून २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी तुकाई उपसा जलसिंचन योजनेची सर्व प्रलंबित कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करण्यात यावीत, तसेच मिरजगाव येथील भैरवनाथ उपसा जलसिंचन योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव ऑगस्टअखेरपर्यंत शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात यावा, असे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दोन्ही योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
तुकाई उपसा जलसिंचन योजनेची प्रलंबित कामे वन्यजीव विभागाच्या आवश्यक परवानग्यांसह १५ जुलैपर्यंत पूर्ण करून योजनेचा शुभारंभ करण्यात यावा, असेही बैठकीत निश्चित करण्यात आले.
या योजनेद्वारे कुकडी धरणातील पाण्याचा लाभ कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार असून सिंचनासह पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे यांनी योजनेच्या आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेत संबंधित विभागांना कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले की, कर्जत तालुक्यातील १९ गावांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असून कुकडी डाव्या कालव्यातून पाणी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे.

प्रा. शिंदे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या प्रकल्पाकडे विशेष लक्ष असून प्रकल्पासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून उर्वरित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत. शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, तुकाई उपसा जलसिंचन योजनेची एकूण कामे सुमारे ९० टक्के पूर्ण झाली आहेत. पंपगृह आणि उर्ध्वगामी नलिकेची कामे ९८ टक्के पूर्ण झाली असून वितरण प्रणालीची कामे ७२ टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय विद्युत वाहिन्या, पोल उभारणी, भूमिगत केबल आणि इतर तांत्रिक कामांचाही यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.

दरम्यान, मिरजगाव परिसरातील भैरवनाथ उपसा जलसिंचन योजनेबाबतही बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. अवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीना कालव्यातून पाणी उपसा करून १२ बंधारे भरण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत पंपगृह, उर्ध्वगामी वाहिन्या, वितरण वाहिन्या, वितरण कुंड, सौर ऊर्जा निर्मिती तसेच विद्युत पुरवठा व्यवस्था उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
भैरवनाथ योजना जनहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करत सभापती प्रा. राम शिंदे आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सर्वेक्षण, संकल्पना, आरेखन आणि अन्य तांत्रिक बाबींसह परिपूर्ण प्रस्ताव ऑगस्टअखेरपर्यंत शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश दिले.
बैठकीस जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र फापळकर, मिरजगावचे सरपंच नितीन खेतमाळीस, पुणे वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक केशव वाबळे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्य अभियंता नितीन दुसाने, अधीक्षक अभियंता धनंजय दाहेदार, अधीक्षक अभियंता हरिभाऊ गिते, कार्यकारी अभियंता पांडुरंग गायसमुद्रे, कार्यकारी अभियंता डी. वाय. गुळूमकर, कार्यकारी अभियंता सु. वि. गांगुर्डे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन :
विधानभवन येथे तुकाई व भैरवनाथ उपसा जलसिंचन योजनांच्या प्रगतीचा आढावा घेताना विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व जलसंधारण मंत्री संजय राठोड.

