नव्या सक्षम सहकार धोरणामुळे राज्याची अर्थव्यवस्था बळकट होणार : विवेक जुगादे
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क अहिल्यानगर –
राज्यात नव्याने तयार होत असलेल्या सहकार धोरणामुळे सहकारी संस्थांचे कामकाज अधिक सुलभ होऊन राज्याची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी केले. सहकार भारतीच्या अहिल्यानगर दक्षिण विभागाच्या वतीने आयोजित ‘सहकार संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे व विवेक जुगादे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रवी बोरावके, प्रदेश सहसंघटन प्रमुख प्रवीण बुलाख, विभागप्रमुख संतोष गायकवाड, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे किसनराव लोटके, उद्धवराव दुसुंगे, दत्ता गावडे, दिलीप मोहोळकर, सुनील हजारे, मिलिंद गंधे, अनंत होशिंग, प्रदीप पत्की यांच्यासह सहकार क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेक जुगादे म्हणाले की, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकार चळवळ अधिक पारदर्शक आणि सक्षम करण्याचे काम सुरू आहे. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यासाठी नवे सहकार धोरण तयार केले जात आहे. राज्यभर सहकार प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घेण्यासाठी ‘सहकार संवाद’ उपक्रम राबविण्यात येत आहे. नव्या धोरणामुळे सहकारी संस्थांवरील अनावश्यक अडचणी कमी होऊन सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळेल.

ते पुढे म्हणाले की, १९६० च्या जुन्या सहकार कायद्यामध्ये काळानुरूप बदल करणे आवश्यक आहे. सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप कमी करून राजकारणमुक्त व भ्रष्टाचारमुक्त सहकारावर भर देणे गरजेचे आहे. तसेच युवक आणि महिलांचा सहभाग वाढवून सहकार चळवळीला नवे नेतृत्व मिळणे काळाची गरज आहे.
नूतन अध्यक्ष अजिनाथ हजारे यांनी प्रास्ताविकात सहकार भारतीच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, “सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने आणि बदलत्या काळातील गरजा लक्षात घेऊन नवीन सहकार धोरणाची निर्मिती होत आहे. सहकार भारतीच्या माध्यमातून सहकारी संस्थांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सहकार चळवळ अधिक पारदर्शक, सक्षम आणि युवकाभिमुख करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.”

जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे म्हणाले, सहकार भारतीच्या विविध उपक्रमांमुळे राज्यातील सहकारी संस्थांमध्ये सकारात्मक बदल होत आहेत. नागरी सहकारी पतसंस्थांनी केवळ संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक वाढीकडे लक्ष देणे आवश्यक असून व्याजदरातील अनावश्यक स्पर्धा टाळल्यास संस्थांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत राहील.
दरम्यान, विभागप्रमुख संतोष गायकवाड यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. अध्यक्षपदी अजिनाथ हजारे, महामंत्रीपदी ॲड. उमेश देवकर, महिला प्रमुखपदी आशाताई मिस्कीन, संघटन प्रमुखपदी सुरेश खामकर, प्रसिद्धी प्रमुखपदी वैभव जोशी आणि श्रीगोंदा तालुकाप्रमुखपदी भानुदास रासकर यांची निवड जाहीर करण्यात आली. विवेक जुगादे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. आभार जिल्हा महामंत्री उमेश देवकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश खामकर, आशाताई कराळे, वैभव जोशी आदींनी परिश्रम घेतले.
