खाकऱ्याच्या चवीतून लाखोंची उलाढाल !
‘लखपती दीदी’ प्रियंका बेरड यांची यशस्वी भरारी !
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – दि. १३ डिसेंबर
ग्रामीण भागातील महिलांना केवळ ‘चूल आणि मूल’ या चौकटीत न पाहता, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाचा ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) एक ‘दीपस्तंभ’ ठरला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील दरेवाडी येथील सौ. प्रियंका राजेंद्र बेरड यांचा प्रवास याच अभियानाच्या यशाची साक्ष देणारा आहे. एका सामान्य गृहिणीने जिद्द, कष्ट आणि शासनाच्या योजनेची सांगड घालत उभ्या केलेल्या ‘खाकरा’ व्यवसायाची ही प्रेरणादायी यशकथा आहे.
बेरड कुटुंबात खाकरा बनवण्याचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आलेला होता. प्रियंकाताईंचे सासरे अत्यंत कष्टाने हा व्यवसाय सांभाळत होते; मात्र, तो केवळ घरगुती स्वरूपाचा होता. प्रियंकाताईंच्या मनात या वडिलोपार्जित कलेला आधुनिकतेची जोड देत एका ‘ब्रँड’मध्ये रूपांतरित करण्याची इच्छा होती, परंतु योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांना दिशा मिळत नव्हती. अशातच ‘उमेद’ अभियानाची ‘वर्धिनी’ त्यांच्या घरी आली आणि त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळाली.

एकाकी लढण्यापेक्षा सांघिक शक्तीने प्रगती साधता येते, हे ओळखून प्रियंकाताईंनी १७ ऑक्टोबर २०१७ रोजी ‘विहान महिला स्वयं सहाय्यता समूहा’ची स्थापना केली. त्यांना ‘मळगंगा महिला ग्राम संघ’ आणि ‘शिवबा महिला प्रभाग संघा’चे भक्कम पाठबळ लाभले. व्यवसाय विस्तारासाठी भांडवलाची गरज असताना, ‘उमेद’ अभियानाने त्यांना मोलाचा हातभार लावला.
‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने’अंतर्गत (PMFME) त्यांना ३ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले, तसेच ‘बीज भांडवल’ योजनेतून ४ लाख रुपयांचे सहाय्य मिळाले. या आर्थिक बळामुळे त्यांनी व्यवसायात यांत्रिकीकरण केले आणि उत्पादनाचा दर्जा वाढवला.
आज त्यांच्याकडे अत्याधुनिक पॅकेजिंग आणि स्वच्छतेचे निकष पाळून ६ विविध प्रकारचे खाकरे बनवले जातात. विशेष म्हणजे, ज्या गुजरात राज्याची ओळख ‘खाकरा’ हा मुख्य पदार्थ म्हणून आहे, तिथेही प्रियंकाताईंच्या ‘मेड इन अहिल्यानगर’ खाकऱ्याला मोठी मागणी आहे. दर्जेदार भाजणी, कुरकुरीतपणा आणि अस्सल चव यामुळे ग्राहकांची पसंती मिळत आहे. प्रियंकाताई आत्मविश्वासाने सांगतात की, “आमच्या खाकऱ्यासारखी चव आणि गुणवत्ता तुम्हाला क्वचितच मिळेल.”

केवळ स्वतःचा विकास न साधता, प्रियंकाताईंनी गावातील इतर महिलांनाही सक्षम केले आहे. आज त्यांच्या युनिटमध्ये ९ ते १० स्थानिक महिलांना दररोज रोजगार मिळतो, ज्यातून त्यांना दिवसाला ३०० रुपये उत्पन्न मिळते. दररोज ३० ते ४० किलो खाकऱ्यांचे उत्पादन घेणाऱ्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल आज २० लाख रुपयांच्या घरात पोहोचली आहे. या आर्थिक यशामुळे सौ. प्रियंका बेरड आज अभिमानाने ‘लखपती दीदी’ म्हणून ओळखल्या जातात. पतीची खंबीर साथ व ‘उमेद’चे मार्गदर्शन यांच्या जोरावर प्रियंकाताईंनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. ग्रामीण भागातील महिलांना योग्य संधी, प्रशिक्षण आणि आर्थिक पाठबळ मिळाले, तर त्या केवळ कुटुंबाचाच नव्हे, तर गावाचा आणि राज्याचा आर्थिक कायापालट करू शकतात, हे सौ. प्रियंका राजेंद्र बेरड यांनी सिद्ध केले आहे.
